सोयबीन खरेदीचा शिमगा काही अजून संपलेला नाही. हे सरकार वारंवार मुदत वाढीचे नाट्य करून शेतकर्यांवर उपकार केल्याचे भासवत असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. तर शेतकरी, शेती प्रश्नावर अजूनही सरकार इतके गोंधळलेला का आहे? असा खरा सवाल आहे. सोयाबीनचे उत्पादन चांगले असताना सारखा डेडलाईनचा पाढा वाचणाऱ्या सरकारवर शेतकरी संतापले आहेत.
नाफेडवर सोयाबीन शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा
नाफेड अंतर्गत सोयाबीन खरेदीची आजचा शेवटचा दिवस आहे. राज्यभरातील हजारो शेतकऱ्यांचे लाखो क्विंटल सोयाबीन खरेदी झालेले नाही. सोयाबीन खरेदीची मुदत वाढवून देण्याची मागणी अमरावती येथील शेतकऱ्यांनी सरकारकडे केली आहे. अमरावती मधील नाफेड केंद्रावर लागल्या सोयाबीनच्या वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. नाफेडमध्ये सोयाबीनला मिळतोय 4 हजार 892 रुपये प्रति क्विंटलपर्यंत भाव मिळत आहे. तर खासगी बाजार पेठेमध्ये सोयाबीनचे दर 3 हजार 500 ते 4 हजारापर्यंत आहेत. सोयाबीन खरेदी न झाल्यास शेतकऱ्यांच मोठं नुकसान होणार आहे.
हे सुद्धा वाचा
पाऊण किलोमीटर रांग
जालन्याच्या नाफेड केंद्रावर अर्धा ते पाऊण किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. सोयाबीन खरेदीचा आजचा शेवटचा दिवस असल्याने मोठ्या प्रमाणात शेतकरी नाफेड केंद्रावर दाखल झाले आहेत. जिल्ह्यातील अनेक शेतकर्यांची सोयाबीन खरेदी बाकी असल्याने मुदत वाढ देण्याची सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी मागणी केली आहे. खरेदीचा मॅसेज येऊन तीन दिवस झाले तरीही शेतकर्यांचा अजूनही नंबर लागलेला नाही. सरकारने किमान एक महिन्याची मुदत वाढवून द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
शेतकरी अद्याप रांगेतच
शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा म्हणून केंद्र सरकार ने नाफेडच्या मार्फत सोयाबीन खरेदी सुरू केली आहे मात्र या खरेदीचा आजचा शेवटचा दिवस असून, अजूनही वाशिम जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांची सोयाबीन मोजणी बाकी आहे. शेतकर्यांनी सोयाबीन मोजून घेण्यासाठी खरेदी केंद्राबाहेर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. तसेच नोंदणी असलेल्या सोयाबीन शेतकर्यांना मुदत वाढ मिळेल का? याकडे शेतकर्यांचे लक्ष लागले आहे.
पाच दिवसांपासून शेतकरी उन्हात
नाफेडद्वारे हमीभावाने खरेदी करण्यात येणार्या सोयाबीनची आज शेवटची तारीख आहे. मुदत संपणार असल्याने शेतकर्यांनी नांदेडच्या अर्धापूर येथील नाफेड केंद्रावर मोठी गर्दी केली आहे. पाच दिवसांपासून शेतकरी खरेदी केंद्रावर मुक्कामी आहेत. शेतकर्यांना राहण्याची व्यवस्था नसल्याने उघड्यावर रात्र काढावी लागत आहे, तर दुसरीकडे पाच दिवस सोयाबीन घेऊन आलेले वाहने एकाच जागी उभे असल्याने वाहनाचाही अतिरिक्त खर्च शेतकर्यांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे आता सोयाबीन खरेदीची मुदत वाढवून देण्यात यावी अशी मागणी शेतकर्यांकडून होत आहे.
सोयाबीनला हमी भाव द्या
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील हनुमंत वाडी शिवारात नाफेड मार्फत सोयाबीन खरेदी करण्यात येते. खरेदीचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे नाफेड खरेदी केंद्र बाहेर शेतकर्यांची मोठी गर्दी आहे. मध्यरात्रीपासून शेतकरी सोयाबीन खरेदी केंद्रात ठाण मांडून आहेत. 31 जानेवारीनंतर सोयाबीन खरेदीची मुदत वाढ देण्यात आली. अद्याप अनेक सोयाबीन उत्पादक शेतकरी या विक्रीपासून वंचित आहेत. त्यामुळे आणखी काही दिवस मुदतवाढ देऊन सोयाबीन पिकाला हमीभाव द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते आहे.
20 हजार शेतकर्यांचे सोयाबीन शिल्लक
सोयाबीन खरेदीसाठी आज शेवटचा दिवस असल्याने हमीभाव खरेदी केंद्राला मुदत वाढवून देण्याची मागणी शेतकर्यांकडून केली जात आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये आणखी 20 हजार शेतकर्यांची सोयाबीन शिल्लक आहे. खरेदी केंद्र आज बंद केली जाणार आहेत, त्यामुळे शेतकर्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.
पोर्टल झाले बंद
हमी भावाने सोयाबीन खरेदी करण्याची मुदत अगदी काही तासांवर आली असून लातूर जिल्ह्यात आतापर्यंत १६ लाख ८४ हजार १७० क्विंटल सोयाबीन खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले आहे पोर्टल बंद झाल्यानंतर कधीही नोंदणी आणि खरेदी थांबू शकते, अशी परिस्थिती आहे. दरम्यान, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी पुन्हा मुदत वाढवून देण्याची मागणी सरकारकडे केली आहे.
संसदेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करणार
सोयाबीनची खरेदी होणं आवश्यक होतं ती झाली नाही, मी त्या बाबतीत मुदत वाढीसाठी संबंधित मंत्र्यांना पत्र देणार आहे. मुदतवाढ दिली नाही तर सोमवारी संसदेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करणार आहे, असा इशारा खासदार नीलेश लंके यांनी दिला आहे. 8 दिवसाच्या मुदत वाढीने काही होत नाही, शेतकर्यांना मोकळेपणाने मुदत दिली पाहिजे. शेतकरी राजा हा अन्नदाता आहे तो सुखी राहिला तर देश सुखी राहणार, असे ते म्हणाले.
Web Title – नाफेडवर खरेदी केंद्रावर लांबच लांब रांगा; आज शेवटचा दिवस, मायबाप सरकार सोयाबीन शेतकर्यांची परीक्षा पाहू नका, मुदत वाढीचा निर्णय केव्हा? – Marathi News | Soybean Purchase Long queues on Nafed; Today is the last day, The State government hasn’t look at the test of soybean farmers, when will the decision to extend the deadline